भारतात बरोबर २५ वर्षांपूर्वी मोबाइल युगाला सुरुवात झाली होती. म्हणजेच ३१ जुलै १९९५ रोजी या दिवशी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकाता इथलं आपलं मुख्यालय रायटर्स बिल्डिंग इथून तत्कालीन केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना दिल्लीतील संचार भवन इथं पहिला मोबाइल दूरध्वनी केला होता. भारतातल्या मोबाइल क्रांतीची बीजं त्या वर्षीच्या आजच्या तारखेला पेरली गेलेली होती.
भारतात १९९४मध्ये मोबाइल सेवेची चाहूल लागली होती. तेव्हा सरकारने दिल्ली, कलकत्ता, मुंबई व चेन्नई चार महानगरांमध्ये खासगी कंपन्यांना जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल सेवा पुरवण्यासाठी परवाने दिले होते. प्रत्येक राज्यातील दूरसंचार क्षेत्रामध्ये दोन खासगी कंपन्या सेवा पुरवतील, असे निश्चित केले गेले. त्या वेळी सकाळी व संध्याकाळच्या ‘पीक टाइम’ला मोबाइल कॉलचा दर होता तब्बल १६.८० रुपये प्रति मिनिट, तर दिवसाच्या इतर वेळी मिनिटाला ८.४० रुपये मोजावे लागत. इनकमिंग कॉलदेखील तितकेच पैसे मोजावे लागत. शिवाय लँडलाइनला फोन केला तर त्याबद्दल बीएसएनएल आणखी जास्तीचा दर आकारे ते वेगळंच. (मोबाइलच्या कॉलचे दर प्रचंड असल्यानं खास भारतीय कल्पक ‘मिस्ड कॉल’ ही संकल्पना याच काळात जन्माला आली.) झालंच तर एसएमएसला त्या काळी एक रुपया मोजावा लागत असे. तेव्हा केवळ नोकिया, सिमेन्स, मोटारोला आणि एरिक्सन यांसारख्या मोजक्याच कंपन्या हँडसेट बनवत असत. त्यांची किंमतही ३०-४० हजारांच्या घरात होती.
सन १९९६मध्ये दूरसंचार कंपन्यांनी जवळजवळ ३० हजार कोटी रुपये परवान्यांची रक्कम म्हणून भरले होते. इतका मोठा आर्थिक बोजा त्यांच्यावर पडल्यामुळे, त्यांचं कंबरडंच पारच मोडलं होतं. त्यामुळं अखेर १९९९मध्ये देशाच्या दूरसंचार धोरणात बदल करून सरकारनं कंपन्यांनी वार्षिक परवान्याची रक्कम भरण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा परवाना फी म्हणून भरण्याची म्हणजेच ‘एजीआर’ची पद्धत उपलब्ध करून दिली. पुढच्या काही वर्षांतच दूरसंचार क्षेत्रासाठीच्या परकीय गुंतवणुकीची मर्यादाही ४९ टक्क्यांहून ७४ टक्क्यांपर्यंत वाढवली गेली. त्यामुळे परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली.
पुढे सन २००१मध्ये ‘सीडीएमए’ या नव्या तंत्रज्ञानाला परवानगी मिळाली. सीडीएमए तंत्रज्ञान सुरुवातीला स्थानिक टेलिफोनसाठी ‘वायरलेस इन लोकल लूप’ (डब्ल्यूएलएल) म्हणून वापरले जात असे. याच काळात ‘रिलायन्स इन्फोकॉम’ने वायरलेस इन लोकल लूपचा परवाना मिळवून दूरसंचार क्षेत्रात पहिल्यांदा प्रवेश मिळवला. ज्या वेळी मोबाइल फोनचा दर जवळजवळ १७ रुपये होता, त्या वेळी पोस्टकार्डापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना टेलिफोनवर बोलता आलं पाहिजे, असं धीरूभाई अंबानी यांचं स्वप्न होतं. लवकरच स्थानिक परवान्यावर मोबाइल सेवा पुरवणारी ही कंपनी राष्ट्रीय पातळीवर सेवा पुरवणारी कंपनी बनली. त्या काळातच फोन करणाऱ्या व्यक्तीने पैसे भरायची म्हणजे ‘कॉलिंग पार्टी पे’ ही पद्धत सुरू झाली. लवकरच रिलायन्स इन्फोकॉमच्या स्पर्धेत बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्या उतरल्यावरही मोबाइल कॉल्सचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले.
सन २०००च्या सुरुवातीला ब्लॅकबेरी आणि नंतरच्या काळात अॅपल आणि अँड्रॉइड उपलब्ध झाल्यानं ग्राहकांच्या खिशात जणू कम्प्युटरच आला. इंटरनेट, ई-मेल, इन्स्टंट मेसेजिंग या साऱ्या गोष्टी कोठेही वापरता येऊ लागल्या. सन २०१०मध्ये टाटा इंडिकॉमनं देशात थ्री-जी, तर २०१२मध्ये भारतात ‘एअरटेल’नं पहिल्यांदा ‘फोर-जी’ नेटवर्क सेवा द्यायला सुरुवात केली. सन २०००च्या दशकातच एअरसेल, लूप, व्हिडिओकॉन, स्पाइस यांसारख्या अनेक मोबाईल कंपन्या दूरसंचार क्षेत्रात उतरल्या. एके वेळी तर एकेका दूरसंचार क्षेत्रात आठ-आठ टेलिफोन कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचू पाहत होत्या.
मात्र, या टेलिकॉम क्रांतीच्या काही काळ्या बाजूही आहेत. यामधील दूरसंचार घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा यांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता. त्यामध्ये अनेक केंद्रीय नेत्यांना आपलं पद गमवावं लागलं. सुखराम, ए. राजा यांसारख्या काही मंत्र्यांना तर तुरुंगातही जावं लागलं. अखेर या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं १२२ परवाने रद्द केले. अनेक गुंतवणूक कंपन्यांचे पैसे बुडाले. पुढं सरकारने परवाना शुल्क रद्द करून दिलेल्या ‘एजीआर’सुविधेतही गैरप्रकार घडला. आज सर्वोच्च न्यायालयात सरकारला देण्याच्या या थकीत एजीआर रकमेबाबतचा खटला दीर्घकाळ चालू आहे.
सन १९९८मध्ये भारतात मोबाइल फोनचे केवळ आठ लाख ग्राहक होते. ती संख्या वाढून आत्ता तब्बल १२० कोटींवर पोचलेली आहे. यात सिंहाचा वाटा आहे २०१६मध्ये सुरू झालेल्या जिओ मोबाइलचा. या कंपनीनं अत्यंत कमी दरात मोबाइल कॉल व वेगवान डेटा सेवा सुरू केली. शिवाय केवळ पाचशे रुपयांत लोकांना मोबाइल हँडसेट देण्याची योजना राबवल्याने या कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले. अन्य स्पर्धकांवर मोठा दबाव निर्माण झाला. जिओसारखी महाकाय दूरसंचार कंपनी यात उतरल्यानंतर बहुसंख्य छोटे स्पर्धक भुईसपाट झाले. आज देशात केवळ रिलायन्स, एअरटेल व वोडाफोन-आयडिया या तीन प्रमुख खासगी कंपन्या आणि एमटीएनएल व बीएसएनएल या सरकारी कंपनी उरलेल्या आहेत. त्यातल्या केवळ दोनच खासगी कंपन्या नफ्यात आहेत. बाकी कंपन्यांची आर्थिक परिस्थिती अवघड आहे. आज या उद्योगावर असणारा कर्जाचा बोजा तब्बल आठ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
देशात मोबाइल संस्कृती वाढवण्यामध्ये एअरटेलचे सुनील भारती मित्तल आणि जिओचे मुकेश अंबानी या दोन व्यावसायिकांचं नाव घ्यावं लागेल. या दोघांच्या कंपन्यांकडे आज भारतातील सुमारे ७० टक्के ग्राहक आहेत. आता मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर बोलण्यासाठी कमी आणि डेटासाठी अधिक होऊ लागलेला आहे. सन २०२१मध्ये भारतात ‘फाइव्ह-जी’ नेटवर्कसाठीच्या चाचण्या सुरू होत आहेत. विशेष म्हणजे यात चीनसारख्या परदेशावर अवलंबून न राहता पूर्णपणे देशात विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यात जिओ, टेक महिंद्रा, विप्रो, आयटीआय यांसारख्या स्वदेशी कंपन्यांनी आघाडी घेतलेली आहे.
आज ‘कोव्हिड-१९’मुळे साऱ्याच गोष्टी पार बदलून गेलेल्या आहेत. आज वेगवान इंटरनेट नसतं, तर काय दुरवस्था झाली असती याची आपल्याला कल्पनाही करवणार नाही. सध्या बहुसंख्य व्यवसाय केवळ इंटरनेटच्या बळावर तगून आहेत. बँकिंग, सॉफ्टवेअर, मनोरंजन हे सारे उद्योग आज इंटरनेट आणि मोबाइल फोनच्या जोरावर सुरू आहेत. टीव्हीचे ग्राहक हळूहळू हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम यांसारख्या ‘ओटीटी’ मंचाकडे वळू लागलेलेआहेत. मार्च २०२०पासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अन्य क्षेत्रांत मंदी असली तरी मोबाइल क्षेत्रात मात्र तेजी आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मोबाइलचा वापर १५ टक्क्यांनी वाढला आहे. जिओ, वोडाफोन-आयडिया व एअरटेल या कंपन्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
मनोरंजनासोबतच फेसबुक आणि व्हॉट्सअॅप आणि यू-ट्यूबसारख्या समाजमाध्यमांमुळे मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून मनोरंजनासोबतच संदेशांची देवाणघेवाणही सहजी करता येत असल्यामुळे स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज होऊन बसली आहे. तरुण असोत की प्रौढ; सगळ्यांची पसंती आता स्मार्टफोनला आहे. दिवसेंदिवस माणसाचं एकाकीपण वाढतं आहे. खास करून लॉकडाउनच्या काळात तर हे अधिकच जाणवतं आहे. प्रत्येक माणसाचा सर्वांत प्रिय सखा त्याचा मोबाइलच झाला आहे. आपले आई-वडील, जोडीदार यांपेक्षाही जास्त वेळ माणूस मोबाइलसोबत घालवत असतो. स्मार्टफोन हा प्रत्येकाचा बंधू, सखा (आणि गुरूसुद्धा) झाला आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच जाणार आहे. पुढच्या २५ वर्षांत हे तंत्रज्ञान किती भरारी घेतं हे पाहणं नकीच रंजक ठरेल.
(लेखक माहिती तंत्रज्ञान व दळणवळण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.